Thursday 11 April 2019

नियतीने अखेर फास आवळला ! पण नक्की कुणाचा ?


©उमाकांत चव्हाण,
"नियतीने अखेर फास आवळला..!" असा मेसेज कालपासून प्रत्येक जणाच्या व्हाट्सअपवर, प्रत्येक ग्रुप मध्ये फिरत आहे.

केपटाउन या दक्षिण आफ्रिकेतील शहरात पाणी पूर्णपणे बंद झाले. किव्हा जगातलं पहिलं पाणी विरहित शहर म्हणून केप टाऊनला घोषित केले गेलं, अस आपल्याला व्हाट्सप च्या माध्यमातून कळलं !

पण खरच का हो हे असं झालंय ?

केपटाउन चा इतिहास तुम्ही पाहिला तर केपटाउन हे पृथ्वीच्या अगदी खालच्या बाजूला असलेले एक सुंदर शहर..! पर्यटनासाठी भरपूर लोक कायम इथं येत जात असतात. तुम्ही फोटो पाहिले तर अक्षरशः केपटाऊनच्या प्रेमात पडल इतकं सुंदर शहर..! 2013-14 साल या शहरातील किंबहुना या आसपासच्या परिसरातील पाण्याची पातळी हळू कमी होत गेली, त्याचे आकडे सोबत दिलेले आहेत.2014-15-16 या सालात हीच पातळी ज्याला आपण भूजलपातळी म्हणतो ती इतक्या प्रमाणात खाली गेली ही जवळजवळ पाण्याचे दुर्भिक्ष जाणवलं आणि पाणी कमतरता सुरू झाली.

कदाचित तुम्हाला आठवत असेल आपल्यातले काही क्रिकेटर दीड-दोन वर्षांपूर्वी क्रिकेट खेळायला गेले होते त्यावेळी आपण पाणी जास्त वापरतो म्हणून आपल्याला कमी पाण्यात आंघोळ करा म्हणून सांगण्यात आलं होतं ही न्यूज ही प्रत्येक चॅनलवर व्हायरल झाली होती.

मग हा मेसेज आजच का व्हायरल व्हावा ?

प्रत्येकाला वाटतं आपल्या भागात दुष्काळ आहे आणि आपण पाणी जपून वापरले पाहिजे पण खरंच अस वाटतं का बघा आठवून ? बघा जर आपण पाणी कसे वापरतो..?

पाण्याची उधळपट्टी करण्यात आपण खूप एक्सपर्ट आहे..! गाड्या धुणे, कुत्री मांजरे धुणे, म्हशी-गुर धुणे, उरलं तर बागेत पाणी मारणे, गरम होते म्हणून गच्चीवर पाणी मारणे, पाइपच्या पाईप झाडांच्या फांद्यामध्ये टाकून निघून जाणे, पाणी वर येईपर्यंत नळ बंद न करणे, गटरांमध्ये मध्ये पाणी वाहत सोडणे, काही नसलं तर भांडी धुणी काढा आणि गरम होतंय रस्त्यावर पाणी मारणे ह्या गोष्टी आपण सर्रास पाहतोच ना ?

आपल्या भागात, आपल्या आजूबाजूला हे आपल्याला होताना दिसते आणि आपलेच लोक करतात हे सगळं..! फक्त मेसेज फॉरवर्ड केले की "पाणी वाचवा...!" की झालं का आपलं काम ?

कधीतरी, काहीतरी महत्वपूर्ण सामाजिक संदेश देणारा मेेेसेज येतो. जो पाहतो तो दोन मिनिटे वरून नजर फिरवतात हेडलाईन वाचतात मेसेज कॉपी करतात आणि देतात ढकलून पुढं !

कुणासाठी करतोय ? काय करतोय ? याचं थोडही भान नसताना !

आम्ही खूप सधन भागात राहतो, आजूबाजुला खूप धरणं आणि बंधारे आहेत आणि धरणात भरपूर पाणी साठा आहे, म्हणूण, आम्ही काय केलं ? तर आमची चांगली सुपीक जमीन होती त्या जमिनीत उसाचे पीक घेतलं. काळ्या मातीत ऊस होताच, आता डोंगरावरही ऊस लावला. त्या उसाला भरपूर पाणी पाजायच, इतकं पाणी पाजायचं की, पाणी बांधातून ओव्हरफ्लोव्ह झालं पाहिजे. प्रत्येकाच्या शेतातून  ते रस्त्यावर वाहताना दिसले पाहिजे, तेव्हा आम्हाला कळणार की आमच्या ऊसाला पाणी पुरेसं झालं...!

उरलं तर आहेच की दुसऱ्या पिकांना..!!

आमच्याकडे जास्त पाणी आहे, म्हणून आम्ही जास्त युज करतो, पण लोकांना हे कळत नाहीये की जिथे पाण्याचा थेंब न् थेंब महत्त्वाचा आहे, तिथले लोक एक वाटीभरून पाणी फेकून देताना सुद्धा चार वेळा विचार करतात..! याउलट आम्ही काय करतो..? तर उधळपट्टी...!

आहे त्या गोष्टीचे संवर्धन करणे किंवा साठवून ठेवणे किंवा त्या गोष्टीचा मोल जाणणे ही खरी गरज आहे ना..? की केपटाऊनमध्ये पाणी कमतरता झाली म्हणून आम्ही मेसेज करतोय...?

आमचे मित्र मेसेज चांगला आहे म्हणून फॉरवर्ड करतात, पण त्यांना मेसेज मधला मतितार्थ जाणून तस वर्तणूक करायला खरंच जमतं का ? आणि खरच जर मनापासून तो मेसेज तुम्ही वाचून फॉरवर्ड केला असाल तर निश्चितच उद्यापासून पाणी वापरताना चार वेळा विचार करा...! की आपण पाणी वापरतो त्या पाण्याचं मोल काय आहे ?

माझा हा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्याला विरोध नाहीये, माझा विरोध आहे असले मेसेज फॉरवर्ड करून विसरून जाणाऱ्या माणसाला...!!
(काल एकाने हा मेसेज फॉरवर्ड केला आणि तोच दुपारी पाईपने स्वतःची कार धुताना दारात मला दिसला)

केपटाउन मधली पाण्याची परिस्थिती आहे हे गेले चार-पाच वर्षे अशीच चालू आहे, आता ते फक्त हायलाईट झाले एवढेच मला सांगायचे आहे. याच्या आधीही अशीच कंडीशन होती आणि फक्त केपटाऊनच का ? जगातली कित्येक शहरात असेच पाण्याचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, आणि हे प्रॉब्लेम आत्ता चालू झालेले नाहीत. विदर्भात जाऊन किंवा मराठवाड्यात जाऊन पहा दुष्काळ म्हणजे काय असतो केपटाऊन चे फोटो पाहून केप टाउन ची बातमी स्प्रेड करण्यापेक्षा आपल्या भागात जे झाले आहे एकदा बघा आणि स्वतः बदलायला शिका! कारण आपल्याकडे आहे म्हणून आपण भरपूर वापरतोय पण ज्या दिवशी संपेल ना त्यादिवशी मेसेज वाचण्यासाठी सुद्धा डोळ्यात पाणी शिल्लक राहणार नाही !
पाणी खरच बहुमोल आहे त्याचा वापर चांगला करा जिथे गरज आहेत जितकी गरज आहे तितकच पाणी वापरा, कारण कोणीतरी म्हणला आहे तिसरे महायुद्ध हे फक्त पाण्यामुळे होणार आहे !

1 comment:

  1. होळी, रंगपंचमी, गणपती विसर्जन यावेळी आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया!

    ReplyDelete

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...