Sunday 21 July 2019

गटारी म्हणजे फक्त दारू पिणेच का ? Umakant chavan

गटारी जवळ आली आहे ?

©उमाकांत चव्हाण.

खरंच मला या विषयावर लिहावं असं बरेच दिवस वाटत होतं, योगायोगाने दुपारी एक मित्र भेटला आणि बोलला यंदा गटारीला बाहेर जाऊया..!

तसं पण नॉनव्हेज खानं मला जास्त आवडत नाही, त्यामुळे बाहेरचं नॉनव्हेज शक्यतो टाळतोच... परंतु *गटारी* म्हणजे काय ? हा प्रश्न तसाच डोक्यात राहिला. आज घरी आलो आणि ठरवलं या माझ्या देशातल्या सुंदर परंपरे मधल्या *दीप अमावस्येला* ज्या लोकांनी *गटारी* म्हणून नवीन नाव दिलेला आहे हे एकंदरीत आलं कसे ? यावर थोडासा प्रकाश टाकावा, म्हणून हा एवढा लेखन-प्रपंच...!

खरंतर *गटारी अमावस्या* हा सणच भारतीय संस्कृतीत कुठेच नाही. गटारी अमावस्या ही आपण निर्माण केलेली वृत्ती आहे. गटारी म्हणजेच अपभ्रंश झालेला *गत-आहार* हा शब्द आहे, गत आहार म्हणजे जुना किंवा पूर्वीचा आहार यामध्ये आदिम काळापासून मासाहार चालू असायचा. आदिम कालखंडात लोक शिकार करून जगायचे. त्यानंतर आपल्या देशात शेतीप्रधान संस्कृती निर्माण झाली. परंतु या *गत-आहाराला* गटारी नावाने (अलंकारिक ?) केलं गेलं आणि आणि या दरवर्षी श्रावणाच्या आधी येणाऱ्या अमावस्येला आपण गटारी अमावस्या म्हणू लागलो.

*शुभम करोति कल्याणम, आरोग्यम् धनसंपदा..
शत्रूबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते..!*

आपल्या संस्कृतीत पंचमहाभूतांना प्रचंड महत्त्व दिले गेले आहे. या पंचमहाभूतांना मध्ये *अग्निदेव* म्हणजेच आपल्या घरातील दिवा ज्याचे स्थान प्रत्येक देवघरात, शुभकार्यात खूप महत्त्वाचे मानले जाते. हा दिवा आपण केलेल्या कर्माची साक्ष म्हणून मानला जातो. शास्त्रातही असंच म्हणलं गेलेला आहे की, दिव्याला साक्षी किंवा अग्नीला साक्षी मानून मी हे व्रत करतो. तसेच अग्नीला साक्षी मानून आज देखील आपले लग्न ठरते.

*अग्नीची* जी मूलभूत संरचना आहे किंवा अग्नीचे स्थान आपल्या संस्कृतीत आहे ती खूप मोठी आहे. त्या समईतील *ज्योतीकडे* पाहून आज देखील आपण प्रसन्नतेने चेहऱ्यावर आनंद आणतो आणि आणि घरात कितीही अंधकार  असेल तरीही त्या ज्योतीतील अग्नि आपलं घर स्वच्छ व प्रकाशमान ठेवण्याकरिता प्रयत्न करत असतो.

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी सर्व दिव्यांची पूजा करायची, रांगोळी काढायची, पाटावर दिवे मांडून त्यांना गंध-अक्षता-फुलं वाहायची आणि नमस्कार करायचा. त्याला नैवेद्याला  कणकेचे गोड दिवे ठेवण्याची परंपरा देखील काही ठिकाणी आहे.

असा हा भारतीय संस्कृतीतील अतिशय सुंदर सण पंचमहाभूतांना साक्षी मानून साजरा केला जातो. त्या सणाला *दिव्याची अमावस्या* किंवा *दीप-अमावस्या* मानले जाते त्याचा अमावस्येला आज काल गटारी अमावस्या म्हणून दारू ढोसायची नियमबद्ध परंपरा करण्याचे अवडंबर समाजात रुजले गेले आहे ते खरंच चुकीच आहे असं मला वाटतं.

गटारी अमावस्या म्हणजे फक्त दारू पिण्याचा दिवस ! बास एवढा एकच विचार समाजात रूढ झालेला आहे आणि आपली नवीन पिढी व्यसनाधीन होऊ लागलेली आहे.

असा कोणताही धर्म खरंच सांगतो का की दारू प्या, कोंबडी आणि बकरे कापा व पार्ट्या करा ?

बहुदा कोणताच धर्म असे सांगत नाही, पण आजकाल बरेच लोक खुलेआम नियम परंपरा धाब्यावर बसवून चंगळवादाला आपलंसं करत आहेत. याचा धोका त्यांच्या स्वतःच्या शरीराला व भावी पिढीला देखील नक्कीच आहे. दारू पिणे किंवा मांसाहार करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. याबाबत माझं कुठलंही मत मी मांडू शकणार नाही कारण की ज्याचं त्याला कळतं किती पिली पाहिजे ? का नाही ? परंतु आपल्या संस्कृतीतील आपल्या परंपरेतील असलेल्या चांगल्या सणांना आपण जर हिणवून *गटारी अमावस्या* असे नाव देत असेल तर ते नक्कीच योग्य नाही असे मला वाटते.

दीप-अमावस्या साजरी करणे हा आपल्या परंपरेतील उत्कृष्ट सण त्या दिवसापासून श्रावण चालू होतो व श्रावणात मांसाहार वर्ज्य केला जातो, असे मानले जाते. परंतु असं कुठेही नोंद नाहीये की श्रावणाच्या आदल्या दिवशी भसाभसा बकरी आणि कोंबडी कापून पोट भरून घ्या व महिन्याभराची दारू एकदम ढोसून घ्या.

इथून पुढे आपल्या संस्कृतीतील गत-हारी या सणाला आपण "दीप अमावस्या" या नावानेच संबोधून आपली परंपरा आणि आपले सण अबाधित ठेवू असं मला वाटतं. आपल्या परंपरेचा आदर करून आपल्या देशातील संस्कृतीचा आदर करून पंचमहाभूतांच्या बद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच *दीप-अमावस्या* होय.

(कृपया हा लेख संपूर्णतः माझ्या वैयक्तिक विचारांशी निगडीत आहे यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा कसलाही हेतू नाही)

©उमाकांत चव्हाण.
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.

1 comment:

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...